काल पर्यंत हे झाड दुःखी होतं
सगळी पानं झडून गेली होती
कोणत्याही जीवांची त्यावर वस्ती नव्हती
उभं होतं ते बोडकं त्या हिरवाईच्या मध्ये
आज ते झाड ओळखूच येत नाहीये!
जणू स्पर्श झालाय त्याला परिसाचा
काल होती चिन्ह नाजूक हसणाऱ्या पालवीची
आज मात्र ते हिरव्या पानांनी दिलखुलास हसतंय
कधी न नटलेलं ते, आज बहराचा शृंगार करून सजलंय
खरं तर हरवलंय ते हिरवाईत आता
कारण त्याच्या फुलण्यामागे, ते एक घरट बांधणार छोटंसं पाखरू
जशा त्याने आणलेल्या कड्या आकार घेत होत्या
तसा त्या झाडाचा अहं तयार होत होता
शेवटी त्या पाखराने ती सगळी नटवी झाडं सोडून त्याला निवडलं होतं!!
आता ते पाखरू आपला संसार थाटणार.......
पण तेवढ्यात काहीतरी निसटल,
एक पान खाली पडलं
पण झाडाच्या त्या मानी मनाला, कुठे त्याचं सूतक?
एक नाही तर हजार आहेत!!!
पण हळूहळू त्या हजारांची शंभर, दहा, एक अशी गळती झाली,
आणि राहिलं ते परत बोडकं उभं
निसर्गतः गेला ते पाखरू आपलं घरट आणि झाड तिथेच सोडून....
त्या बहरलेल्या बोडक्याचा बहार लुटून ....
ते पहिलं पडलेलं पान म्हणालं,....
ती तुझ्यावर चढलेली नशा त्या पाखराची नव्हती ,
माझी होती....
तुला फुटलेल्या पहिल्या पानाची
त्यावेळी नाही कळलं पण आज कळतंय तुला
आसरा दे, खत बनून येईल तुझ्या मदतीला
बोडक्या झाडाने ऐकला ते, आणि निराश न होतां उभं राहिलं...
खाली ते पान झिजत होतं,
पण त्या झाडाच्या मनात ते पाखरुच उडत होतं !!!!!!
